Showing posts with label मराठी. Show all posts
Showing posts with label मराठी. Show all posts

Sunday, 15 October 2023

पितृ पंधरवडा

 स्मरण पंधरवडा 

Written by: संगीता थोरात.

माझ्या मैत्रीणीचा फोन आला , ती म्हणाली , "संगीता तुला माहिती आहे ना , माझ्या सासूबाई मागच्या वर्षी गेल्यात आणि अता महालय सुरू होतंय तर त्यांच्या नावाने एकजणीला जेवायला बोलवायचं आहे, तर, तुला चालेल का...?

कारण , मी आत्ताच माझ्या सासुबाईंच्या जवळच्या  नातेवाईकांमध्ये एक- दोघीला फोन केला तर त्या म्हणाल्या , की आम्ही श्राद्धाचं जेवत नाही म्हणून, म्हटलं तुझ्याशी बोलावं."

 मी तिला म्हंटल की "अगं जेवायला येणं न येणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे . परंतु , आपल्या संस्कृतीत अन्न हे पूर्णब्रम्ह मानलं जातं मग ते श्राद्दाचं की बारशाचं....? 

त्यात बदल होतो का....?

आणि मी जर अशा गोष्टी मानत असेल तर मी ही एक दिवस जाणार आहे ना.....?

हा प्रत्येकाच्या विचारसरणीचा प्रश्न आहे . तेव्हा काळजी करू नकोस मी येईन जेवायला ."

सारिका म्हणाली . "मला खूप बरं वाटलं ग, अता कुणाला शोधायचं म्हणून मला खरंच खूप टेन्शन आलं होतं .तसं मी आईंच्या नावे अनाथाश्रमात पण जेवण पाठवणार आहे परंतु,  आपल्याकडं घरात जेवायला बोलवतात म्हणून....."

सारिकाला येते म्हणून सांगून मी फोन ठेवला.  मात्र मनांत म्हंटलं की

जर एकविसाव्या शतकातील बदल सहजपणे स्वीकारत असू तर वैचारिक मानसिकता.....?

ती सुद्धा सकारात्मकतेनं नाही बदलली गेली तर आपण माणूस या नात्यानं आपलंच नुकसान करून घेत नाही का.....? 




हा पंधरवडा म्हणजे पितृश्राद्धाचा म्हणून ओळखला जातो.

खरंतर ज्याच्यावर आपली श्रद्धा ते श्राद्ध , 

आपल्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या संस्कारात,  परंपरेनं माणसां विषयी , निसर्गा विषयी , पशू पक्ष्यां विषयी वेगवेगळ्या सणवारांच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त केली जाते .

कारण आपली भारतीय संस्कृती दान , धर्म , परोपकार , त्याग , या अढळ संस्कार मूल्ये असणाऱ्या पायांवर उभी आहे .


मग ती जिवंत जीवांविषयी असो वा आपल्या पूर्वजां विषयी असो , आजचे आपले जे अस्तित्व आहे ते सर्व थोर क्रांतिकारक , समाज सुधारक,  महापुरूष , महामानव,  संतमंडळी , पूर्वज वाडवडील यांच्या  मुळेच !

म्हणजेच आजची पिढी ही कालच्या पिढीच्या खांद्यावर उभी असते.


भाद्रपद पौर्णिमे पासून अश्विन अमावस्या म्हणजेच  सर्व पित्री अमावस्या पर्यंत  पितृ श्राद्ध घातले जाते .

   या पंधरा दिवसातील  एक दिवस तिथी नुसार आपल्या सर्वच पूर्वजांचे तसेच गुरुं, सहकारी , आप्तेष्टांचे स्मरण करुन श्राद्ध विधी केले जाते. त्यांच्या स्मरणार्थ दान , धर्म केला जातो.


जेव्हा शेकडो वर्षा पूर्वी कोणत्याही सोयी , सुविधा नव्हत्या . आजच्या सारखी कोणतीही साधनं उपलब्ध नसताना , आपल्या या पूर्वजांनी अनेक खस्ता खाऊन , हाल अपेष्टांचा सामना करुन , अनेक  प्रसंगी जीवाचे मोल अर्पण करून आपला देश, आपलं स्वराज्य , आणि राज्य अटोकाट प्रयत्नपूर्वक संरक्षण  केलं , जतन करून वाढवलं केवळ त्यांच्यामुळेच आज आपण आहोत हा कृतज्ञता भाव यांतून व्यक्त होत असतो.


पूर्वजांनी आपल्या कुटुंबा साठी दिलेलं योगदान त्याचे स्मरण करून त्यांच्या आदरभावा प्रति

या काळात दिले जाणारे पाणी किंवा तर्पण हा जरी कर्मकांडाचा भाग असला तरी ( कर्मकांड ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार ) व्यक्ती किंवा समाज मानसिकतेचा विचार केला तर आपुलकी , जिव्हाळा , एकमेकां विषयी प्रेम या माध्यमातून व्यक्त करायचं म्हणून त्याला तर्पण म्हटल गेलं असावं.


माझी आजी जी धार्मिक , अध्यात्मिक आणि practical  असणारी , रोज देवपूजा करताना अगदी पशु , पक्षी , मुंग्या , चिमण्या , जीव , जंतूना देखील नैवेद्य अर्पण करायची . आणि तरी देखील वर्षातून एकदा हे श्राद्धही जेवू घालायची . एकदा मी तिला विचारलं , " रोज जर तु सर्व जीवांना नैवेद्य अर्पण करतेस , तर मग पुन्हा हे वेगळं श्राद्ध , नैवेद्य कशासाठी...? 

तेव्हा आजीनं सांगितलं की , " साधारण गणपती पासूनच्या  या काळात सृष्टीचं भरण ,  पोषण झालेलं असतं. शेतं हिरव्या ओटीनं सजलेली असतात . त्यामुळं पंचतत्व म्हणजे , पृथ्वी , आप, तेज, वायु आणि आकाश हे  उफाणावर असतात .  

याच काळात पंचतत्वांचा प्रभाव दिसून येतो असं अध्यात्मात देखील सांगितलं जातं.

   निसर्गाचाच नियम म्हणजे  निसर्ग सृष्टीचे खऱ्या अर्थाने भरण पोषण करतो.

मूठभर पेरलेल्या धान्यातूंन ओंजळ भरभरून धान्य मिळतं.  एका छोट्याशा बीजातूंन वटवृक्ष तयार होतो . निसर्ग आपल्याला भरभरून देतच असतो. 

ही निसर्गाची खूप मोठी किमया असेल तर मनुष्याने निसर्गाचा हा संस्कार आपल्या मनामध्ये बिंबवला पाहिजे .

निसर्गाने सांगितलेला हा दातृत्वाचा भाव मानवी मनावर संस्काराचा किती तरी मोठा प्रभाव निर्माण करणारा आहे .

केवळ परंपरा म्हणून या रीती रिवाजांकडे न बघता आपल्या या  पूर्वजांचे पुण्यस्मरण करणे , त्यांच्या  आशीर्वादाने , त्यांच्या आचार , सद्विचार , तत्त्वांना स्मरण करणं . शक्य ते आपल्यात उतरविण्याचा प्रयत्न करणं आणि आपलं आयुष्य समृद्ध करण्याची ही  संकल्पना खूप उदात्त स्वरूपाची आहे हे लक्षात येतं. केवळ परंपरे कडे न पाहता त्यामागे व्यापक विचारांचे ऋण केवढे मोठे आहे हे समजून घ्यायला हवं.


जेव्हा एखादं मूल हुशार , संस्कारशील , गुणी असतं तेव्हा या संस्कारांची  पाळंमुळं  आधीच्या पिढीतील किंवा त्या पिढीनं ती बीजं रूजवलेली असतात .

शहाजी राजे भोसलेंचे वडील  मालोजी राजे भोसले अन्याय , अत्याचार  जुलूम सहन न करता  मुघलांच्या विरूद्ध लढले .पुढची पिढी म्हणजेच शहाजी राजांनी  मुघलांच्या चाकरीत राहून देखील स्वराज्याचा विचार करत बंड उभारलं होतं परंतु त्यावेळी ते बंड  यशस्वी झालं नव्हतं. मात्र मुघलांच्या चाकरीत राहून देखील शहाजी राजांनी आपल्या लेकराला स्वाभिमानाचं बाळकडू पाजलं  . जिजाऊनं या हुकूमशाही राजवटी विरूद्ध विचारांचा , संस्काराचा अंगार फुलवला, आई भवानीच्या आशीर्वादानं ,  छत्रपतीं शिवप्रभूंच्या रूपात हिंदवी स्वराज्याचा पराक्रम साकारला.

मात्र महाराजांनी कधीही  अमावस्या , पौर्णिमा, शनिवार , बुधवार , शुभ , अशुभ पाहिलं नव्हतं हे ही ध्यानात घ्यायला हवं.

स्वराज्याचं हे बीज तीन चार पिढ्यांच्या आधीच रूजवलं गेलं होतं जे स्वराज्याच्या रूपानं फुललं आणि फळांस आलं.

        

 आमच्या आजच्या जगण्यासाठी  कित्येक जीवांनी आपला जीव गमवला आहे . 


कोणत्याही जात, पात , धर्म , पंथाचे आम्ही असलो तरी आमच्या या सर्व पूर्वजांचं  रोजच्या जगण्यात...?  त्याचं साधं  स्मरण , योगदान , आठवण देखील आम्ही करत नाही याचं कारण आम्हांला सर्व काही फुकट  मिळालेलं आहे .

आणि सर्व काही मोफत , फुकट मिळाले की त्याची किंमत नेहमीच शून्य वाटते.  

        कोणताही धर्म , कोणताही धर्मग्रंथ माणसाला विचार  करायला शिकवतो. मानवता  हाच एकमेव जात, पंथ , धर्म असावा. आणि निसर्ग नियमाचं पालन असावं . हेच आमच्या शेकडो वर्षांपासून जन्मांस आलेल्या पूर्वजांनी लिहून ठेवलं , कथा  सांगितल्या , कीर्तनं केली, दानाचं महत्त्व सांगितलं . त्यासाठी मात्र पैशानंच श्रीमंत असणं गरजेचं नाही . मनाची श्रीमंती महत्वाची . भुकेल्यास घासातला घास आणि घोटभर पाणी दिलं तर ते ही दान होतं . मात्र त्यासाठी आमच्या मनांत दानत असणं महत्वाचं . अपरिग्रह म्हणजे फक्त जमा करणं , मी आणि माझ्या पुरतं न राहता , जे आपल्या  कुवतीनुसार असेल ते आपण करू शकतो. मग ते त्यांच्या एखाद्या  विचारांच स्मरण करणं , त्याचं कर्तृत्व आठवणीत उजळणं निदान इतकं तर आपण नक्कीच करू शकतो .

आजच्या नवीन पिढीला हे सर्व समजावणं आपली  जबाबदारी आहे की हे कशासाठी आणि का करायचं..? ते समजून सांगता यायला हव.  यानिमित्तानं दोन घास एखाद्या गोर गरीब लेकरांच्या पोटात गेले किंवा एखाद्या अनाथ आश्रमातील प्रेम आणि मायेसाठी आसुसलेल्यां जीवांस मिळाले  तर पुण्य किती मिळेल हे नाही सांगता येणार पण त्या भुकेल्या जीवाचा आत्मा नक्कीच तृप्त होईल . 

आणि आपली नवीन पिढी देखील ही positively आनंदानं हे  स्वीकारेल  नक्की नाही का......?


एक घडलेली घटना आठवते..

काळे काकींना चार मुली आणि एक मुलगा .  मुलं लहान असतानाच काळे काका गेले .

पण खंबीरपणे संसार सांभाळत काकींनी दोन मुलींना सोबत घेत मजुरी करून , खडतर संघर्ष  करत डोक्यावर छत उभारलं ,दोन एकर शेती घेऊन शेताच्या बांधावर मुला नातवंडाना सगळी फळं खायला मिळावी म्हणून सगळी  फळझाड लावली . डोक्यावर पाणी आणून झाडं वाढवली .

मुलींची लग्न केली . मुलाला शिक्षण देऊन लग्न केलं.


  काकी  त्या घरातील एक व्यक्ती नाही  तर एक शक्ती होत्या  .


वृद्धापकाळानं काकी गेल्या तेव्हा मुलींनी विचार केला की आईनं आयुष्यभर कष्टानं मिळवलेल्या शेतातच रक्षा विसर्जित करून त्यावर झाडं लावावी.

मात्र सुनेनं , मुलानं आक्षेप घेतला की  , " तुम्ही जाल सासरी निघून पण म्हातारी भूत होऊन आम्हाला त्रास देईल. आम्ही  तिला पितृपक्षात नैवेद्य देऊ पण हे  असलं काही  होऊ देणार नाही म्हणत आकांडतांडव केला. 

अशा दुःखाच्या प्रसंगी नाईलाजाने मुलींनी  माघार घेत रक्षा नदीत जाऊन विसर्जित केली .

 काकींनी कष्टानं उभारलेला सगळा संसार सुनेला , मुलाला चालणार होता , त्या संसारात काकींचा जीव नसेल का राहिला.....?


काकींनी आपल्या कर्तृत्वानं आपलं आईपण आणि मातृत्व सिद्ध केलं होतं पण ......तिचं आईपण मातृत्व आणि वात्सल्य मात्र सत्पात्री , सत्कारणी लागलं नव्हतं .

जिवंत असताना अन् गेल्यानंतरही विटंबना झाली .

वर्षातून एकदा नव्हे रोज जरी त्यांच्या नावे पंचपक्वान्नाचा नैवेद्य दिला  तरी..........

खरंतर सध्या गेलेल्या माणसां पेक्षा जिवंत माणसांची जास्त भिती वाटावी अशी भयाण परिस्थिती आहे .

घरात अंधार झाला तर दिवा लावता येतो पण मनातल्या अंधाराचं , मनांतल्या या भूतांचं काय करायचं.....?

 

  असं म्हणतात की विचारांचा अंधार हा रात्रीच्या अंधारा पेक्षा भयानक असतो. सकारात्मकतेनै विचार करून पलिकडे जेव्हा जाऊ तेव्हा  विचारांचा अंधार मिटून उषःकाल झालेला  नक्कीच दिसेल.

 या पंधरवड्या नंतर घरोघरी स्वच्छता , साफ सफाई करून घरातील जाळी , जळमटं, केरकचरा , जुन्या टाकाऊ वस्तू बाजूला सारत कोपरान् कोपरा  निर्मळ करून त्यासोबत घराचा परिसर स्वच्छ ठेवत पुढे घटस्थापना म्हणून घरोघरी सृष्टीची निर्मात्या आईच पूजन केलं जातं . लागूनच दसरा , दिवाळी येते मग  घरातील स्वच्छता करून घरासमोर सडा, रांगोळी , एखादा दिवा लावला तर घराला आणि अंगणालाच नाहीतर  मनाला देखील प्रसन्नता लाभते . यानिमित्तानं घरासोबतच मनाचं देखील स्वच्छता अभियान करता आलं तर.....?

म्हणजे  मनातील जुनाट,  बुरसट विचारांची , एखाद्या विषयी मनांत धरून ठेवलेली अढी, द्वेष , राग, तिरस्कार ,  इर्षा , समज , गैरसमज , पुर्वाग्रह , अहं हे आपल्या पुरतं काढून टाकता आलं अन् तिथे सकारात्मक विचारांची पेरणी करता आली  तर  घर आणि अंगणा सोबतच मनांच देखील सुशोभिकरण नक्कीच होईल .

हजारो वर्षापासून आमच्या भगवान बुद्धां पासून ते रामदास स्वामी , अगदी  गाडगे बाबा , तुकडोजी बाबा, ( ही यादी बरीच मोठी होईल ) सर्वांनीच मनाला सुशोभित म्हणजेच मन निर्मळ राखण्याची शिकवण आम्हाला दिलेली आहे . 

आपल्या भारतभूला इथल्या पवित्र मातीला जो दिव्य इतिहास लाभलाय तो क्वचितच एखाद्या देशाच्या सद्भाग्यात असेल इतके आपण भाग्यवान आहोत .


  आणि सर्वात महात्वाचं म्हणजे   जगाला बदलण्यापेक्षा स्वतःत बदल करणं तेच एकमेव आपल्या हातात आणि हितात देखील असतं नाही का...?


.............संगीता थोरात.

Friday, 22 September 2023

गणपती पूजा कधी सुरु झाली?

 गणपती पूजा कधी सुरु झाली?

लहानपणापासून गणपती हा माझा सगळ्यात आवडीचा देव आहे. त्याच्या विविध रूपात कलात्मक रित्या साकारलेली लग्नपत्रिकेवरची चित्रे मला साठवायला आवडायचे. गणेशोत्सवाची प्रतीक्षा पावसाळा सुरु झाली कि लगेच लागायची. आमच्या गावातले मूर्तिकार मोहन कुंभार यांच्याघरी जाऊन मला आवडता फोटो दाखवून, "मला असा गणपती बनवून पाहिजे" म्हणून मी मागे लागायचो आणि ते पण त्यांच्या गडबडीत माझ्या बालहट्टाला तयार व्हायचे. माझे वडील फार कडक स्वभावाचे होते पण माझी आवड समजून घेऊन त्यांनी कधी मला मोठा गणपती घेण्यापासून रोखले नाही. आमच्या वाड्यातले गणपती विसर्जन गौरी बरोबर झाले तरी आमचा गणपती सार्वजनिक गणपती सारखा दहा दिवस असायचा. दहा दिवस गणपती, आरत्या आणि मंडळांनी रात्री ठेवलेले विडिओ रेकॉर्ड वाले सिनेमे बघण्यात कधी जात होते, कळत न्हवते. 

                                                             चित्र: तिबेट चा विनायक 

एक उत्सव म्हणून गणपती म्हणून बघत असलो तरी लहानपणापासून त्याच्या वेगळ्या रूपाबद्दल जिज्ञासा होती. सुरवातीला दंतकथा मधून तो किती चमत्कारी आहे अस समज होता पण हायस्कुल ला गेलो तेव्हा तो बुद्धी आणि कलेची कशी देवता आहे आणि त्याच्या स्वरूपामधली सांकेतिक मांडणी जसे कि छोटे डोळे म्हणजे बारीक नजर, हाताचे डोके म्हणजे बुद्धी चे प्रतीक वगेरे वगेरे . पण जसा मी दक्षिण पूर्व देश थायलंड, इंडोनेशिया, कंबोडिया इथे फिरलो आणि तिथे पण गणपती ची वेगवेगळ्या रूपात होणारी पूजा बघून आणि जी माहिती मिळेल ती वाचत आणि जसे उमजत गेले तसे समजून घेत गेलो. मला ज्या प्रश्नांची उत्तरे मिळत न्हवती आणि तसे प्रश्न इतर लोकांनापण पडत असणार म्हणून ते खाली मांडत आहे. 


गणपती हा फार प्राचीन देव आहे, प्रथम पूजा त्याची साधारण २५०० वर्षांपूर्वी  बुद्ध काळात सुरु झाली जिथे तो विघ्नहर्ता रूपात रक्षक देवता मनाला जातो. पुढे हि परंपरा हिंदू धर्मात पण काही बदल घडून तो बुद्धी आणि कलेची देवता पण झाला. बुद्ध काळातला बाप्पा मंगलम हा प्राचीन खरिपाच्या  सुगीमधला सण पुढे जाऊन गणेशोत्सव रूपात पुढे रूढ झाला. गणपती चा दुसरा अर्थ रयतेचा राजा/पालक  असा होतो, मौर्यकालीन उगम असल्यामुळे 'गणपती बाप्पा मोरया या' घोषणेचा अर्थ मोर्य राजा पिता आहे असा असल्याचे मत इतिहासकारांचे आहे. पेशवे काळात गणेश उपनिषद (अथर्वशीर्ष) चे लिखान झाले आणि गणेशोत्सव ला राजाश्रय मिळाला आणि मराठा साम्राज्यासोबत तो देशभर पसरला. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणून गणेशोत्सव सामाजिक चळवळ उभी केली. हिंदी सिनेमा च्या गाण्यांनी अजून तो देशभर लोकप्रेय बनत गेला. 

हे सगळे बदल झाले असले तरी मूळ संकल्पना अष्ट विनय (अष्टांग मार्ग) शी निगडित आहे, अष्टविनायक हि एक तात्विक संकल्पना आहे ना कि फक्त फिरून यायची ठिकाणे. या आठ गोष्टी जर आपण आचारात आणल्या तर आपले आयुष्य हे सुखाने भरून जाईल (सुखकर्ता) दुःख संपून जातील ( दुःखहर्ता). दंतकथा फक्त आपल्यापर्यन्त पोचल्या पण अर्थ नाही.

आपण जर अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला तर गणपतीची खऱ्या अर्थाने पूजा होईल आणि जीवन अधिक सुखमय होऊ शकेल. बुद्धानी सांगितलेलं आणि गणेशरूपाने ज्याची पूजा आपण करतॊ हे अष्टांग मार्ग खालीलप्रमाणे आहेत. या मार्गांचे अनुकरण करणे हे हार आणि फुले घालून करता येणाऱ्या पूजेएवढे सोपे नाही. 

१. दृष्टीकोण  - योग्य द्रुष्टी 

२. संकल्प -  योग्य निर्धार

३. वाणी/वाचा  - योग्य बोलणे 

४. कर्म = योग्य काम 

५. उपजीविका - योग्य व्यवसाय 

६. व्यायाम - योग्य प्रयत्न 

७. स्मृती  - योग्य विचार 

८. समाधी  - योग्य एकाग्रता 

हे आठ मार्ग  सोपे होण्यासाठी ते जीवनाच्या तीन विभागात पण सांगितले आहेत. 

१. प्रज्ञा - दृष्टीकोण , संकल्प 

२. शील - वाणी,कर्म, उपजीविका 

३. समाधी - व्यायाम, स्मृती, समाधी  

ज्याअर्थी गणपतीची विविध रूपे आहेत तसे अर्थ पण अनेक आहेत आणि आपल्या बुद्धीला जो पटतो तो आपण घ्यावा कारण  खरे आहे आणि बाकी खोटे आहे असे नाही. 

यावर्षी मी गणपती स्वतः बनवायचे ठरवले आणि यूट्यूब ची मदत घेऊन तो बनवताआला, यात मला आणि माझ्या दोन मुलांना फार मजा पण आली. लहानपणाची आठवण झाली, मी माझ्या आजूबाजूला राहणाऱ्या मित्रांसोबत साधारपणे सहावीत असताना ललकार बालगणेश मित्र मंडळाची स्थापना केली होती, ते मंडळ अजून हि चालू आहे नव्या रूपात आणि न्यू सहकार अशा नवीन नावासोबत. हे मी सांगायचे कारण हे कि या गोष्टीचा माझ्या जडण घडणीवर मोठा परिणाम झाला आणि त्याचा फायदा पुढे जाऊन कॉलेज मध्ये आणि पुढे बिझिनेस सुरु करताना झाला. कारण टीम बनवून काम कसे करायचे हे त्या मंडळाने शिकवले होते.


 एक गाव एक गणपती हा चांगला उपक्रम आहे पण मला वाटते कि पर्यावरण पूरक गेणशोत्सव साजरा केला गेला तर तो घरोघरी साजरा व्हायला हरकत नाही. एकदा वापरून टाकून द्यायच्या प्लास्टिक ची आरास टाळा, मूर्ती मातीचीच घ्या आणि विसर्जन करताना पर्यावरणावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या. जर ज्ञानआणि बुद्धीच्या देवाची पूजा अंध आणि अज्ञान पद्धतीने केलो तर त्याला काहीच अर्थ राहणार नाही.  

क्रमशः गणपती चे कुटुंब आणि त्याची दोन मुले तुम्हाला माहित आहेत का?


Sunday, 23 October 2022

नरकचतुर्दशीला सूर्योदयाच्या आधी अंघोळ नाही केली तर नरकात जातो का?

 



आपल्याला नरकासुराची गोष्ट माहितच आहे, या दिवशी नरकासुराचा वध श्रीकृष्णाने केला.  मी तो पुन्हा सांगत बसत नाही तर यागोष्टीच्या मागे लपलेली तत्वे जी आपली दिवाळी अधिक आनंदि आणि आरोग्यदायी करू शकतात त्याच्याबद्दल बोलणार आहे. 


जरी धनत्रयोदशी हि दिवाळीचा पहिला दिवस असला तरी, लहानपणापासून मला नरकचतुर्दशी हाच पहिला दिवस वाटायचा कारण होते त्या दिवशी पहाटे उठून उटन लावून तेलाने होणारे मालिश आणि त्यानंतर मोती साबणानाने घासून होणारी अंघोळ. लहानपणी घरात सगळ्यात आधी मी अंघोळ करायचो आणि सगळ्यात आधी फटका वाजवायचा अशी स्पर्धा आळीतल्या सगळया मुलांत असायची. 


आपलयाला जीवंतपणी पण कधी कधी नरकात जगायाला लागत असत, त्याचे कारण असू शकते अज्ञान, चिंता, दारिद्र्य किंवा निरोगी नसलेले शरीर किंवा मन. 

नरकयातना या शब्दाचा अर्थ जेनी त्या भोगल्या आहेत त्यांना लगेच समजू शकतो. ज्यांच्या वाटेला त्या आल्या नाहीत त्यांनी त्या कधी भविष्यात पण येऊ नयेत अशी प्रार्थना. 


नरकचतुर्दशीला याच नरकासुराला आपल्या आयुष्यातून बाहेर काढून येणारे नवीन वर्ष सुखात आणि निरोगी जावे म्हणून अभ्यंग स्नानाचा उपयोग होतो. यातील काही महत्वाचे फायदे बघूया. 


१. आरोग्य - शारीवरचा मळ निघून जातो.  शरीराची होणारी मालिश रक्ताभिसरण वाढवते आणि स्नायू पण लवचिक बनतात यातून आपल्याला नवीन ऊर्जा मिळते. त्वचा लुकलुकत स्वच्छ आणि हिवाळ्याबरोबर लढायला तयार होते. 


२. मन - आपल्या मनावर पण बरीच काजळी जमा झालेली असते, चिंता, पच्छाताप अशा बऱ्याच गोष्टी मानसिक त्रासाला कारणीभूत ठरतात. मनाला सुदधा अंघोळ घातली जाते, पहाटेची वेळ आपण अंधारातून प्रकाशाकडे जात असताना अंधार दूर होतो. अंघोळीनंतर नवीन कपडे घातली जातात यातून जुन्या हॉष्टी मागे सोडून परत नव्याने सुरुवात करायची प्रेरणा येते.    


दिवाळी बद्दल बोलताना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतांत 


"मी अविवेकाची काजळी 

फेडूनि विवेकदीप उजळी 

तैं योगियां पाहे दिवाळी  निरंतर..."


यात अंधार म्हणजे अज्ञान आहे आणि त्याची काजळी काढून विवेकाकडे घेऊन आयुष्य सुदृढ करणारी दिवाळी आहे.  नरकचतुर्दशीला दिवाळीची पहिली अंघोळ, छोटी दिवाळी अशा नावाने पण संबोधले जाते. आमच्याकडे पहिली अंघोळ कधी? हे सगळ्यात जास्त ऐकायला मिळणारे वाक्य आहे. 


दिवाळी हि नेहमीच भरभराटीच्या येते असे नाही, बऱ्याचदा जशे कि या वर्षी पावसाने भरपूर नुकसान झाल्यामुले शेतकरी व्यथीत आहे. त्यामुळे हि दिवाळी त्यांना जल्लोषाने साजरी नाही करता येणार. यावेळी गरज आहे प्राथर्नेची जेणेकरून या अपयशाने खचून न जाता  परत रब्बीची पेरणी जोमाने करून प्रयत्न करन्याची ऊर्जा मिळेल. 


सूर्योदयाच्या आधी अंघोळ कर नाहीतर नरकात जाशील, हे आई नेहमी बोलायची पण असा काही नसत असा माझा पूर्ण विश्वास होता. पण असा का बार बोलत असतील? या प्रश्नाचे उत्तर शोधात असताना थोडा शोध घेऊन मिळालेली माहिती हि आहे कि हा दिवस आहे पार्थना आणि आरोग्याचा.  


तुम्हाला जर हि पोस्ट उपयोगी वाटली तर आपल्या मित्रांबरोबर आणि कुटुंबाबरोबर जरूर शेअर करा. 👍👍👍

तुम्हाला या दिवाळीत  सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभो हि शुभेच्छा. 💥







Thursday, 20 October 2022

दिवाळी च्या आधीचा दिवस वसुबारस म्हणजे नक्की काय?

 



दिवाळी किंवा दीपावली म्हणजे दिव्यांची रांग. या ओळीमधला एके एक दिवा हा आपला आयुष्य प्रकाशमय करीत जातो. या ओळीतला पहिला दिवा म्हणजे वसुबारस अथवा गोवत्स द्वादशी. या दिवशी कृषिप्रधान समाजात गाई आणि वासराची पूजा केली जाते. 


काही व्यापारी समाज या दिवासाला 'वाघ बारस' साजरे करतात या वाघ म्हणजे टायगर नाही तर कर्ज किंवा थकबाकी आहे. दिवाळी खरंतर भारतात पारंपारिक आर्थिक वर्ष (फायनांशीयल इयर) आहे जे ब्रिटिश राजवटीच्या आधी प्रचलित होते आणि त्यावेळी महाराष्ट्रात शक कॅलेंडर (पंचांग) व्यवहारात वापरले जायचे. 


वसुबारस/वाघबारस या दिवशी आपली सगळी थकीत देणी देऊन खाती बंद केली जायचे (Book closure), पुढचे पाच दिवस व्यापारी देवाण घेवाण बंद राहून नवीन वर्षाचा पहिल्या दिवशी म्हणजे बलिप्रदीपदा(पाडवा) नवीन खातेवही बनवली जायची आणि परत देवाण घेवाण सुरु केली जायची. आता या दोन्ही गोष्टी मार्च एंडिंग ला केल्या जातात त्यामुळे दिवाळीत फक्त सांकेतिक पद्धतीने आपण साजरे करतो. 


पाडव्याचे वहीपूजन आजही मोठा प्रमाणात  केले जाते पण वसुबारस ला आपले देणे देऊन मग दिवाळी साजरी करण्याची आर्थिक शिस्त हरवली आहे. पण हि प्रथा आपल्या  कुटुंबामध्ये चालू राहावी यासाठी आग्रही राहिले पाहिजे, आर्थिक शिस्तीमधून समृद्धी येते नाकी महागडे फटाके फोडून.  


माझ्या मते ता दिवसाचा मूळ गाभा आहे तो हा कि दिवाळी साजरी करण्याआधी आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करणे.  आपण सुट्टी घेत असू तर सुट्टी वर जाण्यापूर्वी आपली कामे पूर्ण करणे किंवा त्याचे योग्य नियोजन करून देणे. आपल्या गाई आणि म्हशी ज्या उत्पन्न मिळवून देतात त्यांच्याकडे आधी लक्ष देऊन मग पुढचा दिवाळी सण साजरा करणे.   


आणि थोडे दिवाळी च्या मागची पार्श्वभूमी समजून घ्यायचा प्रयत्न केला तर लक्षात येते कि इतर सनातन सण जसे निसर्ग चक्र वर अवलंबून आहेत तसाच दिवाळी पण आहे, खरीप पिकाची विक्री झाली कि येणाऱ्या कमाईने आर्थिक चक्र चालू होते. आलेल्या रकामातेउन सगळ्यात आधी काय करायचे तर ते आपण जी इतरांची देणी लागतो ते द्यावे. 


यालाच आजच्या काळात आपण Financial prudence असे गोंडस नावाने ओळखतो आणि त्यासाठी एक्स्पर्ट लोकांकडून सल्ले घेतो. पण आपल्या पूर्वजांनी किती सहज पद्धतीने सण साजरे करण्यातून लाख मोलाचे ज्ञान जोपासले आहे. आपण पण तो वारसा चालू ठेवला पाहिजे. 


बाकी राम अयोध्येला आला म्हणून आपण दिवाळी सण साजरा करतो वगैरे आपण म्हणून मोकळे होतो पण यातून आपण आपल्या संस्कृतीला फारच वर वर समजून घेतो अस मला वाटते. जर आपण मूळ अर्थ समजून न घेता सण साजरे केले तर ज्या गोष्टीसाठी ते आहेत ती गोष्ट विसरून फक्त त्यांची पार्टी करणे एव्हढी ओळख पुढच्या पिढी मध्ये जाईल. 


सगळ्यांना दिवाळीचा शुभेछया आणि  आपली दिवाळी मंगलमय आणि भरभराटीची होऊद्या. या विषयावर आपल्या काही कंमेंट्स असतील तरी नक्की  करा.                                                               

 पहा दिवाळीबद्दल एक मस्त गाणं  Din Din Diwali Song

Pulkeshan

 saral hruday mahatva , ahankari, utsrinhal tha upkara and  sankat ke samay bachane aate apaman ka badala suchana dete samarpan karane ki ha...